रांजणगाव गणपती येथे तिहेरी हत्याकांड   

शिरूर, (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अनोळखी व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे. लहानग्या बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना गहिवरून आले.
   
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव येथील अहिल्यानगर महामार्गाजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह इतके जळाले की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ’जय भीम’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
    
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलीस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलीस ठाण्याला संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.

Related Articles